दिलासादायक…. मुंबईतील कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 29 दिवसांवर!


मुंबई : कोरोना व्हायरसने आपल्या पूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेतले असून या व्हायरसचा देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यातच महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाला आहे. त्याचबरोबर मुंबई शहराची कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट अशी ओळख बनली होती. पण आता लवकरच हीच ओळख पुसली जाऊ शकते. कारण मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 2.43 टक्क्यांवर आला आहे. माटुंग्यात सर्वात जास्त असून दहिसरमध्ये सर्वात कमी डबलिंग रेट असल्यामुळे मुंबईचे वाईट दिवस संपले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या वाढीच्या दराचा आलेख खाली आला किंवा त्या मार्गावर आहे आणि महिनाभर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर कोरोनाला अतिशय सहजरित्या हाताळू शकतो. 13 मेपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट सुधारल्याची माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्समधील सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी दिली.

इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियनचे डीन डॉ. शशांक जोशी म्हणाले की, राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही कोरोनाबाधितांच्या जवळपास पोहोचली आहे. तसेच 30 दिवसांच्या जवळ रुग्ण दुप्पटीचा कालावधी पोहोचल्याने, ही महामारी मुंबईतून जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपण जर सोशल डिस्टन्सिंग पाळले, सतत हात धुतले, मास्क वापरले तर आपण कोरोनाची दुसरी लाट टाळू शकतो.

डबलिंग रेट 30 दिवसांवर पोहोचला तर अतिरिक्त बेड्सची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर 32 दिवसांवर डबलिंग रेट पोहोचला तर मुंबई महापालिकेला सध्या उपलब्ध बेड्समध्येच चौपट रुग्णांवर उपचार करता येईल, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

विशेष म्हणजे कोरोनाचे दोन महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेले मुंबईतील वरळी, धारावी आणि वांद्रेसारख्या परिसरातील रुग्णसंख्या वाढीचा दर खाली आहे. दरम्यान काल (17 जून) मुंबईत 1359 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकट्या शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 हजार 587 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 3244 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment