मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘महत्वपूर्ण’ सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मान्य


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील सर्वांच्याच लाडकीचा उत्सव असलेल्या यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (18 जून 2020) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात एक बैठक पार पडली. हा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


बैठकीत सहभाग घेतलेल्या सर्वच मंडळांनी यावेळी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचना आणि निर्णय मान्य असल्याचे सांगितले. कोरोना व्हायरस संकट अधिक गरीहे होत असताना राज्यातील सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोस्तव अवघे दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुरु असलेला लॉकडाऊन आणि पाळले जाणारे सोशल डिस्टन्सिंग यांमुळे यंदा गणेशोत्सवाचे काय होणार? हा प्रश्न गणेश भक्तांसह सर्वांनाच सतावत होता. दरम्यान, या प्रश्नावर आता तोडगा निघाला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्यासमोर यंदा असलेले कोरोना व्हायरस संकटाचे आव्हान पाहता सर्वच गणेश मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्याला सर्वच गणेश मंडळांनी एकमुखी सहमती दर्शवली. तसेच, राज्य सरकारचे निर्णय आणि सूचना आपल्याला मान्य आहेत. सरकारला आवश्यक ते ते सर्व सहकार्य करण्याची गणेश मंडळांची तयारी आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला जाणार नाही, असे आश्वासन मंडळांनी यावेळी दिले.


दरम्यान, राज्य सरकारच्या सूचनेनंतर केवळ गणेशोत्सव साधेपणाने नव्हे तर आगमन सोहळेही रद्द करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. प्रामुख्याने मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे गणेश मंडळ आता मंडपातच गणेशमूर्ती घडवणार आहे.

गणेशोत्सव साधेपणाने साजरे करत असताना आगमन सोहळे रद्द झाले आहेत. त्यासोबतच गणेशविसर्जन मिरवणूक काढण्यासही परवानगी नसल्यामुळे गणेश मंडळांना मिरवणुकाही अत्यंत साधेपणाने काढाव्या लागणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंडळ पदाधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये त्याबाबतची माहिती देण्यात येत आहे.

Leave a Comment