उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसची नाराजी दूर


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर आज या वादावर पडदा पडला आहे. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती. ती चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून चर्चेतून आम्ही समाधानी आहोत. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाराज नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी मातोश्रीवर जाऊन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. खासदार संजय राऊत, अनिल देसाई हे देखील यावेळी बैठकीला उपस्थितीत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली. बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

काही विषय असे असता की, समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही समाधानी आहोत. मागे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण रश्मीताईंच्या वडिलांच्या निधनामुळे अशा दुखाच्या प्रसंगी भेट घेणे योग्य नव्हते. पण माध्यमांकडून चर्चा रंगवली गेली. आम्ही एक कुटुंब असून आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर काही विभागानुसार आणि प्रशाकीय समस्येबाबत आम्हाला प्रश्न होते. त्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यांचेही मत जाणून घ्यायचे होते. कोरोनाच्या परिस्थितीत काय मदत करता येईल, काय उपाययोजना करता येईल. मी स्वत: कोकणचा दौरा केला होता. कोकणात काय मदत करता येईल, अशी त्या मागची भूमिका होती. त्यामुळे या बैठकीत व्यक्तिगत अशी कोणतीही भूमिका नव्हती.

जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी आमचे मंत्रिमंडळ तयार झाले होते. मंत्रिमंडळ स्थापन करत असताना समसमान वाटपावर चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांसाठी एवढी चर्चा करण्याची गरज नव्हती. लवकरच याबद्दल समसमान पद्धतीने निर्णय जाहीर होईल, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

कोणतेही सरकार असले तरी त्यात काही विषय हे निर्माण होतच असतात. येथे आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून सरकार स्थापन केले असल्यामुळे हे कुटुंब मोठे आहे. या कुटुंबात काही विषय असतील तर त्यावर चर्चा करून विषय सोडावे लागतात, ते सोडवण्यात आल्याचेही थोरात म्हणाले. काँग्रेस ‘कुरकुर करणारी खाट’ असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून केली होती. असा सवाल विचारला असता, ‘या विषयावर आधीच खूप चर्चा झाली आहे. त्यामुळे यावर फार असे काही बोलण्यासारखे नाही. आजच्या बैठकीला खुद्द संजय राऊत सुद्धा हजर असल्याचे सांगून थोरात यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

Leave a Comment