आठवले यांचे आवाहन; देशातील चीनच्या वस्तूंवर, खाद्य पदार्थांवरही बहिष्कार घाला


मुंबई – भारतातून चीनमध्ये आणि सर्व जगात जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म प्रसारित झाल्यामूळे चीनला भारताने बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण युद्धाची खुमखुमी चीनला जर असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू अशी ताकद आमच्या सैन्यात असल्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. लडाखमधील गलवाण खोर्‍यात चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यांना आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर चीन हे दगाबाज राष्ट्र असून भारतातील चीनच्या वस्तूंवर, खाद्य पदार्थांवरही बहिष्कार घातला पाहिजे. देशातील चायनीस फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

1962 साली भारताला धोका देऊन चीनने हल्ला केला होता. आता भारताचे सैन्य अधिक मजबूत असून चीनला धडा शिकविण्याची ताकद भारतीय सैन्यात आहे. आता भारतात सध्या चीनची देण असलेल्या कोरोनाशी आमचे युद्ध सुरू असल्यामुळे युद्ध करण्याची आमची इच्छा नाही. भारत शांती आणि अहिंसेच्या तत्वावर ठाम आहे. पण जर चीनला युद्धच हवे असेल तर कोरोनाशी होत असलेले युद्ध आणि सीमेवर चीनशी युद्ध आम्ही जरूर जिंकू असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच भारतात चायनीज फूड हॉटेल आणि चायनीज खाद्यपदार्थांवर सर्वांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार घालावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले.

Leave a Comment