गोव्यात यापूढे भाजपला कधीच सत्तेत येऊ देणार नाही


पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणजे राजकीय चूक असल्याचे म्हणत या निर्णयाबद्दल लोकांची माफी मागितली आहे.

रविवारी आपल्या दक्षिण गोव्यातील फतोरदा मतदारसंघातील नागरिकांशी विजय सरदेसाई यांनी संवाद साधला. विजय सरदेसाई यावेळी बोलताना म्हणाले, राज्यातील भाजपचे अकार्यक्षम, अपारदर्शक व प्रशासकीय उत्तरदायीत्व नसलेले सरकार आहे. असे सरकार भविष्यात स्थापन करण्यास कोणतीही मदत करणार नाही. आमच्यासाठी भाजप मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर संपली आहे. यापुढे भविष्यात कधीही भाजपचे सरकार आम्ही स्थापन होऊ देणार नसल्याचे सरदेसाई म्हणाले. मी माझ्या आयुष्यात पर्रिकर यांच्या निधनानंतर सरकारला पाठिंबा देण्याची मोठी राजकीय चूक केली आहे. मला गोव्याच्या नागरिकांची या चुकीसाठी माफी मागायची आहे. आमच्या चुकीमुळे आज गोव्यातील नागरिक त्रास सोसत आहे आणि त्यासाठी प्रायश्चित करण्यास आम्ही तयार असल्याचे सरदेसाई नागरिकांशी बोलताना म्हणाले.

गोवा विधानसभेची २०१७मध्ये निवडणूक झाली होती. ४० सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात परतले. त्यांनी गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात भाजपचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र प्रमोद सावंत यांच्याकडे आली होती. गोवा फॉरवर्ड पक्षाने सावंत यांच्या सरकारचा पाठिंबा कायम ठेवला होता. पण मुख्यमंत्री सावंत यांनी त्यानंतर सरदेसाई यांच्यासह गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता.

Leave a Comment