कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल सामने भरवण्याविषयी चर्चा सुरू आहे. आता या चर्चांविषयी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने मत व्यक्त केले आहे. प्रेक्षकांविना आयपीएल म्हणजे पाहुण्यांशिवाय लग्न असा प्रकार असल्याचे पठाणने म्हटले आहे.
प्रेक्षकांविना आयपीएल म्हणजे बिना वरतीचे लग्न
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पठाण म्हणाला की, सध्या लाईव्ह क्रिकेट जास्त गरजेचे आहे. वरतीशिवाय लग्न अपुर्ण वाटते. आपल्याला देखील प्रेक्षकांविना आयपीएल झाल्यास असेच काहीसे वाटेल. मात्र वरतीशिवाय लग्न देखील होते. अनेक लोक न्यायालयात जाऊन लग्न करतात. अखेर लग्न मात्र होतेच.
पठाण म्हणाला की, चौकार-षटकार मारल्यावर प्रेक्षकांचा मैदानावर जो जल्लोष असतो, तसा उत्साह विना प्रेक्षकांचे दिसणार नाही. सध्या लोकांना लाईव्ह क्रिकेट बघायचे आहे. वय काहीही असो सर्वांना तसा उत्साह हवा आहे.
दरम्यान, अनिश्चित काळासाठी आयपीएल पुढे ढकलण्यात आले असून, टी20 विश्वचषकाविषयी पुढील महिन्यात निर्णय होणार आहे.