देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत ‘नकोशी’ नोंद


नवी दिल्ली – कोरोना पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र तसेच राज्य सरकारांकडून देण्यात येत असलेल्या शिथिलतेमुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यातच मागील नऊ दिवसांपासून दहा हजारांच्या टप्प्यात वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी काल ११ हजाराने वाढली आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित नव्या रुग्णांनी ११ हजाराचा आकडा पार केला. काल दिवसभरात ११,४५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ८ हजार ९९३ एवढी झाली आहे.

दरम्यान देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. देशातील १ लाख ५४ हजार ३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असून एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्राने ओलांडली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, प. बंगालमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनामुळे बळी गेलेल्यांची देशातील संख्या ९ हजारांच्या आसपास पोहचली आहे. मागील २४ तासांत देशात ३८६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर देशात आतापर्यंत ८ हजार ८८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसात मृत्यूची संख्या ३०० हून अधिक आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अनुक्रमे ३५७ आणि ३९६ मृत्यू झाले आहेत. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

Leave a Comment