पाकला झोंबल्या मिरच्या; काश्मीर भारताचाच असल्याचे दाखवल्याने दोन पत्रकारांची हकालपट्टी


नवी दिल्ली – काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, सत्य अद्यापही पाकिस्तानने स्विकारलेले नाही. पण पाकिस्तानी सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या पीटीव्ही न्यूजकडून नकाशा दाखवताना चूक झाली म्हणून थेट पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली . पत्रकारांकडून झालेल्या चुकीचा संदर्भ काश्मीरशी असून काश्मीरला या नकाशामध्ये भारताचा भाग दाखवण्यात आल्यामुळे तेथील दोन पत्रकारांना नोकरी गमवावी लागली आहे.

ही घटना सहा जूनला घडली असून आठ जूनला हा विषय पाकिस्तानी संसदेत उपस्थित करण्यात आल्यानंतर हा विषय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे सिनेटचे चेअरमन सादीक संजरानी यांनी पाठवला. सात जूनला पाकिस्तान टेलिव्हिजन व्यवस्थापकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आणि या चुकीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

पीटीव्ही ही सरकारी मालकीची वृत्तवाहिनी असून या प्रकरणी १० जूनला कारवाई करत दोन पत्रकारांना नोकरीवरुन काढण्यात आले. या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर कठोर कारवाई करण्यात आली, असे ट्विट करुन पीटीव्हीने सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि मानवी हक्क खात्याच्या मंत्री शीरीन माझारी यांनी कारवाईची मागणी केली होती. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन जम्मू-काश्मीरचा भाग असून हे दोन्ही प्रदेश आपले अविभाज्य अंग असल्याचे भारत मानतो.

Leave a Comment