लॉकडाऊनसंदर्भातील अफवेला मुख्यमंत्र्यांकडून पूर्णविराम


मुंबई : कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव देशात सातत्याने वाढ आहेत. त्यातच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. पण केंद्र तसेच राज्य सरकारने लागू केलेल्या अटी व नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे निश्चित झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये, लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. जनतेला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, हाताबाहेर जातांना परिस्थिती दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाऊन पुन्हा कठोर होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, कोरोनाविरुद्धचा लढा आपला संपलेला नाही तो सुरुच असल्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. पण परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत. कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधानता बाळगायची आहे. मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्याच आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करताना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करायचे आहे.

Leave a Comment