एन95 मास्कचा वाढला काळाबाजार; तब्बल 250 टक्क्यांनी वाढली किंमत


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी सध्या एन95 मास्क हे सर्वसामान्यांपासून सर्वांसाठीच आवश्यक बनला आहे. सध्या एन95 मास्कची गरज ओळखून त्यावरही नफा मिळविण्यासाठी या मास्कच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 4 महिन्यात एन95 मास्कची किंमत 250 टक्क्यांनी वाढली. पण, त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आलेले नाही. परिणामी सध्या एन95 मास्कचा काळाबाजार वाढत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सांगितल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छतेसोबत आपल्या चेहरा झाकण्यासाठी एन95 मास्क गरजेचा असल्याचेही सांगण्यात आले. कोरोनाने संपूर्ण जगभरामध्ये घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली आहे. सप्टेंबर 2019 ला शासनाला एन95 मास्क 12 रुपये 25 पैशांना उपलब्ध होत होते. तर हेच मास्क जानेवारी 2020 मध्ये 17 रुपये 33 पैशांना मिळू लागले आणि मार्चच्या शेवटी पर्यंत 42 रुपयांना हे मास्क मिळू लागले. त्यानंतर हे मास्क मे महिन्याच्या मध्यावधीला 63 रुपयांना उपलब्ध झाले होते.

मास्कच्या खरेदीमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये 250 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भारतीयांची गरज ओळखून सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात एन95 मास्कची निर्मिती केलेली आहे. पण, योग्य दरामध्ये शेवटच्या ग्राहकांपर्यंत हे मास्क पोहोचत नाहीत. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर असल्यामुळे हे मास्क घेणे सध्या नागरिकांना परवडत नाही. तसेच या मास्कचा काही ठिकाणी तुटवडा जाणवत असल्यामुळे ते उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाने आपले लक्ष केंद्रित करावे आणि या मास्कच्या मागून जो काळा बाजार सुरू आहे याच्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे.

त्यातच आता एन95 मास्कच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडू लागल्यामुळे याची किंमत नियंत्रित असावी यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नॅशनल फार्मासिटिकल प्राईसिंग ऑथॉरिटी (एनपीपीए) वैद्यकीय वस्तुंच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करत असते. मास्कचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी भारतातील मोठ्या 6 उत्पादकांना 21मे राजी नोटीस काढून एन95 मास्कचे दर निश्चित ठेऊन ते कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. सर्व कंपन्यांचे एकच दर असावेत तसेच सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांमध्ये मास्क विक्रीसाठी उपलब्ध करावेत, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या. काही महत्त्वाच्या कंपन्यांनी त्यानुसार आपल्या मास्कचे दर स्वतःहून कमी केलेले आहेत.

भारतात तयार होणाऱ्या एन95 मास्कच्या किमतीवर जरी नियंत्रण आणले, तरीही बाजारात सर्वच ठिकाणी मिळणाऱ्या चायनीज मास्कवर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न भारतीय उत्पादकांना पडलेला आहे. 3 जून रोजी राज्यात तयार होणाऱ्या एन 95 मास्कच्या दरांचे एक दरपत्रक जाहीर झालेले आहे. शासनाने कमी केलेल्या दरानुसार 95 ते 165 रुपयांपर्यंतचा दर निश्चित करण्यात आलेले आहेत. जानेवारी महिन्यातच्या तुलनेत सध्या कमी केलेले दर पत्रक हे 450 ते 850 टक्के अधिक आहेत. एनपीपीएमार्फत उत्पादक आणि वितरकांना सूचना मिळाल्यानंतर 47 टक्के या उत्पादकांच्या दरामध्ये घट झालेली आहे. साधारण ही घट 23 ते 41 टक्क्यांनी झाल्याचे निदर्शनास येत आहे. जानेवारी महिन्यात एन95 मास्कची किंमत होती त्यापेक्षा सध्या दहापटीने ही किंमत कमी झालेली आहे. बाजारातील चायनीज एन95 मास्कवर बंदी आणत सर्व भारतीय कंपन्यांच्या एन95 मास्कचे दर एकच ठेवले तरच सामान्य ग्राहकांच्या हिताचा निर्णय होणार आहे.

Leave a Comment