आळंदीत माऊली मंदिराजवळ कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू


पुणे: कोरोनाबाधित एका महिलेचा आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ मृत्यू झाल्याने संपूर्ण मंदिर परिसर प्रशासनाने सील केल्यामुळे परवा होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर भाविकांच्या संख्येची मर्यादा आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र आषाढी यात्रेसाठीच्या पालखी सोहळ्याला शासनाने बंदी घालून पादुका केवळ मोजक्या भाविकांसह हेलिकॉप्टरने नेण्याचा निर्णय घेतला असताना 13 जून रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक महिलेचा आळंदी येथील माऊलीच्या मंदिराजवळील कोरोनामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण मंदिर परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. राज्यभरातून दरवर्षी प्रस्थानासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आळंदी येथे येत असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे आधीच प्रशासनाने अतिशय मोजक्या मानकऱ्यांना ऐनवेळी परवानगी देण्याची भूमिका घेतली असताना आता मंदिराजवळील महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मंदिर परिसर बंद करण्यात आला आहे.

शनिवारी होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळा परंपरेप्रमाणे होणार असला तरी चार पुजारी पारंपरिक पद्धतीने आळंदी मंदिरात प्रस्थानाचे उपचार करून पादुका अरफळकर महाराजांना देतील आणि नंतर याच मंदिरातील सभामंडपात 30 जूनपर्यंत पादुका ठेवण्यात येणार आहेत. मंदिर परिसर प्रतिबंधित केल्यामुळे मंदिर आता 30 जूनपर्यंत बंद राहील. आळंदीत यंदा कोरोनामुळे सर्व धर्मशाळा मठ बंद केल्यामुळे जर कोणी वारकरी प्रस्थानासाठी बाहेरून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे खेड प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले आहे. हा सोहळा या वर्षी सर्वच भाविकभक्तांनी घरात बसूनच साजरा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

Leave a Comment