सीमावादप्रकरणी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक


नवी दिल्ली – आज भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. या भागामध्ये मागच्या महिन्याभरापासून तणाव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. हा तोडगा एकाच बैठकीतून लगेच निघणार नाही याची दोन्ही देशांना माहिती आहे. पण काहीतरी सकारात्मक चर्चा सुरु झाल्यास तणाव निवळण्यास मदत होईल. दोन्ही देशांनी सध्या लडाखमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य सुद्धा सज्ज ठेवले आहे. दरम्यान दोन्ही देशांच्या सचिव स्तरावर शनिवारी होणाऱ्या महत्वाच्या बैठकीआधी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी मतभेदाचे पर्यावसन वादामध्ये न करता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बैठक चीनच्या ताब्यातील मोल्डो हट येथे होणार आहे. बैठकीमध्ये १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. तर या बैठकीत चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन सहभागी होतील. हरिंदर सिंग यांच्या तुलनेत लिऊ लिन कनिष्ठ रँकिंगचे अधिकारी आहेत. पण त्यांच्याकडे लडाखमधील नियंत्रण रेषेची जबाबदारी आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगॉग टीएसओ तलावाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या वादावादीनंतर महिन्याभराने ही बैठक होत आहे. भारत आणि चीनची नियंत्रण रेषा या तलावाजवळून जाते. या ठिकाणी सीमा हद्दीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहेत.

Leave a Comment