भोपाळ: काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये त्यांनी भाजपचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या राजकारणात रंगत येण्याची शक्यता आहे. आता ट्विटरमधील बायोमध्ये स्वत:चा उल्लेख ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधियांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘भाजप’ गहाळ
ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. पण मंत्रिमंडळ विस्तार कोरोनामुळे लांबवणीवर पडला आहे. अशातच त्यांच्या समर्थकांना मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आल्यामुळे सिंधिया यांच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचे समजते.
तर दुसरीकडे पोटनिवडणुकीत सिंधिया यांच्या २२ समर्थकांना तिकीट दिल्याचा दावा भाजपने केला आहे. पण आता भाजपमधील बंडखोरीला सुरुवात झाल्यामुळे सिंधिया समर्थकांच्या विजयाची वाट अवघड मानली जात आहे. सिंधिया समर्थकांकडून या सगळ्या घटनाक्रमावर जाहीर भाष्य केले जात नसले तरी दबक्या आवाजात बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु असल्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून भाजपवर दबाव टाकला जात आहे. सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वीही अशाचप्रकारे ट्विटरवरून पक्षाचा उल्लेख हटवला होता.
Sadly, false news travels faster than the truth.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) June 6, 2020
काँग्रेसचा ‘हात’ सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल आज माध्यमांमध्ये अचानक बातमी आली की ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार आहेत आणि एकच चर्चा सुरु झाली. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन अशा वृत्तांवर दु: ख व्यक्त केले.
त्यांनी ट्विट करून लिहिले आहे की, ‘दुर्दैवाने खोट्या बातम्यांचा सत्यापेक्षा वेगवान प्रचार होतो. ही बातमी लिहिण्यापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांना त्याचे ट्विट आवडले होते आणि दोन हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केले होते. मात्र, त्यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांना ट्रोलही केले असून त्यांचे समर्थकही बनावट बातम्यांवरून चिंता व्यक्त करीत आहेत.