‘निसर्ग’चा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटींची तातडीची मदत जाहीर


रायगड – 3 जूनला कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी यावेळेस थळ गावाला भेट दिली आहे. निसर्ग चक्रीवादळाचारायगडमधील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्य सरकारकडून रायगड जिल्हयाच्या पुर्वसनासाठी आज 100 कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.


दरम्यान श्रीवर्धन, रोहा या भागामधील अनेक घरांचे छप्पर चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उडून गेले आहेत. अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झालं आहे. पुढील 4-6 दिवस त्याच्या पंचनाम्यासाठी लागणार आहे. त्यानंतर नुकसान भरपाईचे स्वरूप ठरवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. चक्रीवादळानंतर या भागात वीज पुरवठा, मोबाईल टॉवर यांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यासाठी अधिकची कुमक रायगडमध्ये पाठवण्यात येणार आहे.

रायगडमधील नुकसान भरपाईची रक्कम पंचनामे पाहून ठरवली जाणार आहे. पंचनाम्याला सुरूवात झाली असून त्याचबरोबर भविष्यात चक्रीवादळाचा धोका पाहता काय तयारी करता येऊ शकते? घर बांधण्याची पद्धत कशी असावी? याचा देखील आराखडा बनवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


रायगडकरांनी 3 जूनच्या दुपारी वादळाचा संकट झेलले आहे. या भागात वादळादरम्यान वार्‍याचा वेग सुमारे ताशी 120 किमी एवढा होता. रायगडसोबतच रत्नागिरी, पुणे या भागातही काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. लहान मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्याच्या साफसफाईची काम सुरू करण्यात आली आहे. जनसामान्यांचे आयुष्य पूर्ववत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी त्यावेळी जनतेला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे देखील रायगडमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी स्थानिक रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती दिली आहे.

Leave a Comment