मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी


पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आले असून आज अलिबागला ते धडकण्याचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. यानुसार आज राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सध्या निसर्ग चक्रीवादळाचा ताशी 12 किमी वेगाने प्रवास सुरु आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकताना त्याच वेग ताशी 110 किमी असण्याची शक्यता आहे. सध्या किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्याचा वेग वाढला असून निसर्ग चक्रीवादळ तासागणिक पुढे सरकत असल्याची माहिती आहे. यावेळी अलिबागपासून 140 किलोमीटर तर मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर निसर्ग चक्रीवादळ आहे. दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज पुण्यात पहिल्या पावसानंतर पुणे महानगरपालिकेने केलेली पावसापूर्वी कामांची पोलखोल झाली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर पुण्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वडगाव शेरी याठिकाणी असलेल्या काही सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचले तर अनेक लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी भरले आहे. तसेच अनेक रस्त्यांवर देखील पाणी साचल्याचे चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळाले.

मुंबईवर काल रात्रीपासून निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला होता. रात्री मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसत होता. मध्य मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात होण्याचा अंदाज आहे. तेव्हा दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ला, सायन, चेंबूर सारख्या सखल भागात पाणी साचण्याचा धोका प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. काल सायंकाळपासून नवी मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली आहे. पनवेल, कामोठे, खारघरसह जवळपास संपूर्ण नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच आहे.

काल सायंकाळपासून वसई विरार क्षेत्रात सुरु असणारा पाऊस सकाळी देखील सुरु होता. वसई विरार क्षेत्रातील सर्व रस्ते ओलेचिंब झाले आहेत. उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्याचा अनुभव मिळत आहे. पण आज आणि उद्या निसर्ग चक्रवादळाचे संकट वसई विरार पश्चिम किनारपट्टी घोंघावत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सकाळच्या वेळेत तरी आणखी चक्रीवादळाचे कोणतेही पडसाद वसई, विरार अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसून आले नाहीत. मच्छीमार बांधवांकडून बोटीतील सर्व सामान काढून सुरक्षित स्थळी हलवणे सुरू आहे. समुद्रात हलक्या लाटा वाढत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 300 च्या वर नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका अद्याप कायम असून योग्य ती खबरदारी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून घेण्यात येत आहे. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या जिल्ह्यातील सर्व बोटी रात्री 11 वाजेच्या दरम्यान सुरक्षित माघारी परतल्या आहेत. जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू असून वातावरण ढगाळच आहे, तर दुसरीकडे समुद्र काठावरील व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन कडून देण्यात आल्या असून धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे

तर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर वाहत आहे. हा जोर देखील पहाटेपासून वाढत असल्याचे चित्र आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि गुहागरला बसण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला असून 9 ते 12 या वेळात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागाचा विचार करता रत्नागिरी आणि राजापूर हा भाग कमी प्रभावित होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात आणखी एक एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली असून एक तुकडी दापोली तर दसरी मंडणगड येथे थांबणार आहे.

मान्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पावसाने नागपुरात देखील हजेरी लावली आहे. नागपूर शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस सुरू आहे. आता देखील हलक्या सरी सुरू आहेत. नागपुरात कालपासून वातावरण ढगाळलेले आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा परिणाम आता सातारा भागातही दिसू लागला आहे. पाटण, महाबळेश्वर सह साताऱ्यात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने चागंलाच जोर पकडला आहे. बदलत्या वातावरणामुळे सातारा प्रशासकीय यंत्रणेने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, वाई भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. रात्री 12 वाजेपासून महाबळेश्वरमध्ये 41.0 मिमी, पाचगणी 12.3 मिमी, तापोळा 18.6 मिमी, लमाज 32.4 मिमी, पाटण 40.5 मिमी पाऊस पडला आहे.

Leave a Comment