साई संस्थानने केली कर्मचाऱ्यांची वेतनात कपात


शिर्डी : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कर्मचाऱ्यांच्या वेतनात देशातील श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने 40 टक्क्यांची कपात केली आहे. तुटपूंज्या पगारावर अगोदरच जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

साईसंस्थानच्या रूग्णालयात आणि इतर ठिकाणी सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई मंदीर प्रशासनाने 40 टक्के कपात केली आहे. मुळातच अनेक वर्षापासून तुटपूंज्या पगारावर परिसरातील सुशिक्षित तरुण-तरुणी येथे आपली सेवा देत आहेत. कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्वजण जिवापाड मेहनत करत आहेत, पण त्यांना त्याचा मोबदला दिला जात नाही.

जानेवारी महिन्यात अनेक वर्षाच्या वादानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के वेतनवाढ दिली गेली होती. त्यामुळे हजारो कर्मचारी सुखावले होते. पण आता काही महिन्यातच त्यांच्या आनंदावर विरझण पडले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे, पण आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साईसंस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणाऱ्यांचे पगार कमी केल्याने आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारला साईसंस्थानने कोरोनाच्या या संकटकाळात 51 कोटींची मदत केली. कोरोना केअर सेंटर उभारले आहे. पण त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणे अन्यायकारक असून त्यांनी आपला निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Leave a Comment