लॉकडाऊन इफेक्ट; एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे देशातील अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. पण याचदरम्यान अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरू आहेत. देशात सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. त्यामुळे काही भागांमध्ये आता शिथिलता आणण्यास जरी सुरूवात झाली असली तरीही, देशातील बरेच उद्योगधंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. यामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी मागील महिन्यात वाढली आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE)अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर 31 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 23.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 23.52 टक्के होता. 24 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये बेरोजगारीचा दर 24.3 टक्के होता. हा दर लॉकडाऊन लागू होण्याच्या पहिल्या आठ आठवड्यांच्या कालावधीच्या सरासरी 24.2 टक्के दरापेक्षा अधिक आहे.

बेरोजगारीचा दर देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भातील वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार शहरी भागातील बेरोजगारीचा दर जानेवारी 2020 मध्ये 9.70 टक्के होता, तर मे महिन्यात या दरात 16.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी शहरी भागातील दर मे 2020 पर्यंत 25.79 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर ग्रामीण भागामध्ये जानेवारी 2020 मध्ये बेरोजगारीचा दर 6.06 टक्के होता, त्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 16.42 टक्क्यांची ही वाढ आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर या वाढीनंतर 22.48 टक्के झाला आहे.

CMIE च्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारद्वारे शिथिलता दिल्यानंतर मे महिन्यानंतर साधारण 2 कोटी लोक पुन्हा एकदा नोकरीवर रुजु झाले आहेत. ज्यामुळे देशातील रोजगाराचा दर 2 टक्क्यांनी वाढून 29 टक्क्यावर पोहोचला आहे. हा दर एप्रिलमध्ये 27 टक्के होता. CMIE च्या अहवालानुसार देशभरातील साधारण 12.20 कोटी लोकांना 25 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गमवावी लागली आहे.

Leave a Comment