जाणून घ्या रेड, ग्रीन, यॅलो आणि ऑरेंज अलर्टचा अर्थ


मुंबई : तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीलाधडकणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना या चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर सतर्क राहावे, यामुळेच रेड अलर्ट हा जारी करण्यात येतो. पण हे नेमके किती प्रकारचे अलर्ट असतात, त्याचबरोबर त्याचा अर्थ काय आणि ते केव्हा जारी केलेले जात याची माहिती तुम्ही कधी घेतली आहे का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला या अलर्टचा नेमका काय अर्थ होतो आणि ते केव्हा जारी केले जाते याची माहिती सांगणार आहोत.

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

रेड अलर्ट : नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर सतर्क राहावे, रेड अलर्ट यासाठी जारी करण्यात येतो. लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाणे टाळावे असा या अलर्टचा अर्थ होतो. मोठे नुकसान रेड अलर्टच्या वेळी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

ऑरेंज अलर्ट : नैसर्गिक आपत्ती कोणत्याही क्षणी येऊ शकते, हे सूचित करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. हा अलर्ट नागरिकांनी संकटासाठी तयार रहावे म्हणून देण्यात येतो. पावसामुळे मुंबईत आपत्ती ओढावू शकते, हे सांगण्यासाठी सुरुवातीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्याचबरोबर या अलर्टमध्ये गरज असेल आणि महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असेही सांगितले जाते. या अलर्टद्वारे वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केलेली असते.

येलो अलर्ट : हवामानातील बदलामुळे येत्या काही दिवसांमध्ये नैसर्गिक संकट ओढवू शकते, दैनंदिन कामे रखडू शकतात. त्यामुळे येलो अलर्ट सावधगिरी बाळगण्याच्या हेतून जारी करण्यात येतो.

ग्रीन अलर्ट : सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ग्रीन अलर्ट हा असतो. कोणतेही संकट नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे असा याचा अर्थ होतो. येत्या 48 तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

Leave a Comment