३० जूनपर्यंत बंद राहणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर


पंढरपूर – पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी देवस्थान हे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता ३० जूनपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग राज्यात झपाट्याने वाढत असून मंदिर समितीने सुरक्षेचा उपाय म्हणून देवस्थान आणखी एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून एक महिना भाविकांना मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. देशात यापूर्वी लॉकडाऊनचा ४.० चा कालावधी ३१ मे २०२० पर्यंत ठेवण्यात आला होता. मंदिर समितीनेही त्यानुसार ३१ मेपर्यंत भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असल्याचे १९ मे रोजी जाहीर केले होते. पण हा कालावधी आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या अडीच महिन्यात या लॉकडाऊनचे ४ टप्पे झाले आहेत. राज्यासह देशातील विविध धार्मिक स्थळे तेव्हापासून बंद आहेत. परंतू लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने नवीन नियमावलीमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे खुली करण्याचे निर्देश दिले आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी राज्या सरकारने दिली नसल्याचे ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीत नमूद केल्यामुळे केंद्राने धार्मिक स्थळांना उघडण्याची मंजुरी दिली असली तरी राज्य सरकारने ती नाकारली आहे.

त्याचप्रमाणे वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत निघतात. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणहून संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज या सात प्रमुख पालख्या येतात. लाखोंच्या संख्येने वारकरी यामध्ये एकत्र येत ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात पंढरपूरात दाखल होतात. पण कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण एवढा मोठा समुदाय एकत्र आल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे यंदा हा धोका लक्षात घेत वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment