वादळी-वाऱ्यामुळे ताजमहाल या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान


नवी दिल्ली – ताजमहाल या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे वादळ-वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मुख्य मकबऱ्यातील संगमरवरी रेलिंग उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तुटले असून त्याच्या जाळ्याही पडल्या आहेत. याबाबतची माहिती भारतीय पुरातत्व विभागाने दिली असून मुख्य मकबऱ्यातील संगमरवरी रेलिंग वादळी वाऱ्यामुळे तुटले असून त्याच्या जाळ्या पडल्या आहेत. त्याचबरोबर या वादळी वाऱ्यामुळे ताजमहाल परिसरातील झाडेही कोलमडून पडली आहेत. तसेच ताजमहालच्या परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी बनवलेल्या शेडचे फॉल सीलिंगही पडले आहे. या वादळी वाऱ्यामुळे ताजमहालसोबतच महताब बागच्या भिंतीवर झाड पडले आहे, तर मरियम मकबऱ्यातही झाड पडल्याचे यावेळी भारतीय पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जवळपास 100 किमी प्रति तास वेगाने आग्रा आणि जवळील परिसरात आलेल्या वादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. त्याचबरोबर या वादळामुळे 25 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ताजमहाल गेल्या 68 दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे बंद आहे. एवढ्या दीर्घकाळापासून ताजमहाल बंद राहण्याची आतापर्यंतची बहुतेक ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, आग्रा आणि जवळील परिसरात वादळामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडले असून रहिवाशी परिसरातील काही घरांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment