केरळ किनारपट्टीवर धडकला मान्सून


नवी दिल्ली – भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतात मान्सूनचे आगमन झाले असून केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान याआधी ३० मे रोजी मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने जाहीर केले होते. पण ही माहिती भारतीय हवामान खात्याने फेटाळली होती. त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याने अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान आज सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात रविवारी रात्री अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने पुढील चार दिवस कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

याआधी १ जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात २ जूनला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार आहे.

Leave a Comment