अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना मिटकरींचा इशारा


पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमात पेटलेला आणि महाराष्ट्रभर गेल्या काही दिवसांपासून गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद दोन्ही बाजूंकडून सामोपचाराने मिटवण्यात आला आणि यावेळी बोऱ्हाडे आणि शेरकर या दोघांची चक्क गळाभेट देखील पहायला मिळाली. रविवारी शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर पडदा पडला आहे. यात महत्त्वाची भूमिका तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची ठरली असून बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना हा वाद मिटविण्यात यश आले आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोऱ्हाडे यांनी सोशल माडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओमुळे या प्रकरणाची संपुर्ण राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती आणि शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

या वादाप्रकरणी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केल्याचे म्हटले होते. कोल्हेंच्या या सावध प्रतिक्रियेनंतर कोल्हे यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले.


दरम्यान विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी कोल्हेंसंदर्भातील या भूमिकेवरुन आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोल्हेंची बाजू घेत शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे, महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी ताईत आहेत. चुकीच्या पद्धतीने त्यांना बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावे लागेल, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना अमोल मिटकरी यांनी लक्ष्य केले.

Leave a Comment