शैक्षणिक वर्ष जून महिन्यापासून सुरु झालेच पाहिजे; उद्धव ठाकरेंच्या सूचना


मुंबई : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आता उद्यापासुन देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात मागील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याप्रमाणेच अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. पण कोरोनासोबतची लढाई सुरु असतानाच राज्यामधील शैक्षणिक वर्ष जून महिन्यापासून सुरु झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

जून महिन्यापासून शिक्षण सुरू करावे, याचा अर्थ शाळा सुरू कराव्या असा होत नाही. शाळा सुरु करणे ऑनलाईन, ऑफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे आणि त्याप्रमाणेच शिक्षण सुरू व्हावे. यंदा मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही. शिक्षण हे जीवनावश्यक असून ते थांबता कामा नये. क्वारंटाईन करण्यासाठी ज्या शाळा ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे शासन खर्चातून निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

त्याचबरोबर दुर्गम भागात जिथे कनेक्टिव्हिटी नाही आणि अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाईन शिक्षण सुरू करावे. कोणत्याही परिस्थितीत जूनमध्ये राज्यातील शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झालेच पाहिजे, कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यासाठी प्रायोगिक स्तरावर गुगल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, पण स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले. गेल्या 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले, तसेच ते सोडवण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले. विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही या बैठकीत चर्चा झाली.

Leave a Comment