टीम इंडियाचे कर्णधारपद मिळवून देण्यात धोनीची महत्वपूर्ण भूमिका


मुंबई – टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघींची तुलना करायची म्हटले तर दोघेही विरुद्ध दिशी आहेत. धोनीचा जसा कॅप्टन कुल असा नावलौकिक आहे, तर कोहलीची आक्रमक कर्णधारांमध्ये गणती होते. भारतीय संघासाठी दोघांचे बहुमूल्य योगदान आहे. त्याचबरोबर दोघांनीही सातासमुद्रा पलिकडे भारताचा नावलौकिक वाढवला आहे. पण ज्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद धोनीने सोडल्यानंतर कर्णधारपदाची माळ विराट कोहलीच्या गळ्यात पडली. पण हे कर्णधार पद मिळवून देण्यात धोनीची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे स्वतः विराट कोहलीने फिरकीपटू अश्विनसोबत इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे बोलताना सांगितले.

ज्यावेळी भारतीय संघात माझी निवड झाली, तेव्हापासून माझी शिकण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. मी मैदानावर नेहमी धोनीच्या नजीकच क्षेत्ररक्षण करायचो, त्यावेळी माझ्या बर्‍याच कल्पना मी धोनीला सांगायचो. त्यातील बऱ्याच कल्पना तो नाकारायचाही. पण त्याला जर माझी एखादी कल्पना आवडली, तर तो माझ्याबरोबर काही गोष्टींवर चर्चा देखील करायचा. त्याचे मैदानात असताना माझ्यावर नेहमी बारीक लक्ष असायचे. त्याच्याकडून मी शिकत राहिलो आणि माझ्या जिज्ञासेमुळे कदाचित त्याला असा विश्वास वाटला की माझ्यानंतर हा संघाचे नेतृत्व करू शकतो, असे विराटने सांगितले.

कर्णधार पदावरून धोनी पायउतार झाल्यानंतर मला लगेच कर्णधारपद मिळाले, असे लोकांना वाटत असेल. पण कर्णधार पद मिळाले असे वाटत नाही, कारण निवडकर्त्यांनी मला अचानक भारतीय कर्णधार म्हणून माझी निवड करण्याआधी त्यांनी धोनीला माझ्याबद्दल मत विचारले असणार. म्हणूनच मला विश्वास आहे की भारताचे कर्णधारपद मिळवून देण्यात धोनीची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे विराट म्हणाला.

Leave a Comment