कोरोनामुळे दिल्ली सरकारच्या तिजोरीत खडखडाट; केंद्राकडे मागितले ५ हजार कोटी


नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या तिजोरीत कोरोनाच्या संकटामुळे खडखडाट झाला असून आमच्याकडे सद्यपरिस्थिती कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे राहिले नसल्यामुळे केंद्र सरकारकडे केजरीवाल सरकारने ५,००० कोटी रुपयांची तातडीची मदत मागितल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये सिसोदिया म्हणाले, दिल्ली सरकारची ८५ टक्के कर वसुली कोरोना आणि लॉकडाउनमुळे थांबली आहे. सरकारला त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून ५००० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्यांना केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीची रक्कमही अद्याप दिल्ली सरकारला मिळालेली नाही.


दिल्ली सरकारच्या महसूलाचा आढावा घेण्यात आला असून त्यानुसार, आता दिल्ली सरकारच्या तिजोरीत पैसाच शिल्लक न राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरजेच्या खर्चांसाठी सरकारला ३,५०० कोटी रुपयांची गरज भासते. पण, आजमितीस एकूण १७३५ कोटी रुपयांचाच महसूल गोळा झाला आहे. तर आणखी ७,००० कोटी रुपयांचा महसूल येणे बाकी असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी आणि आवश्यक कामकाजांसाठी केंद्राकडे ५,००० कोटी रुपयांची तातडीची मागणी दिल्ली सरकारकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment