अमित शहांचा कबुलीनामा; मरकज रोखला असता तर ही वेळच आली नसती


नवी दिल्ली – शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती झाली. यावेळी आजतकच्या ई-अजेंडा या एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही वेळेवर मरकजचा कार्यक्रम रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली दिली आहे.

शहा पुढे म्हणाले, वर्षभर असे कार्यक्रम दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये होत असतात. पण तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये असल्यामुळे मला वाटते की, जर हा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता आणि वैद्यकीय सुविधा तेथील लोकांना पुरवल्या असत्या तर कदाचित आजची ही वेळ आली नसती.

दरम्यान, देशभरातील कोरोना वॉरिअर्सवर अनेक राज्यांमध्ये हल्ले झाले आहेत. शहा यावर बोलताना म्हणाले, कोरोना वॉरिअर्ससोबत सरकार प्रत्येक आहे. देशभरात अशा ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावले उचलण्यात आली आहे. आजवर भारतात जितकी संकट आणि महामारी आली आहे. सर्व सरकारांनी त्याच्याशी लढा दिला आहे. सरकारांनी प्रत्येक वेळी परिवर्तनं आणली होती. पण संपूर्ण देशच यावेळी याच्याशी लढत आहे. देशभरातील नागरिकांना जनता कर्फ्यू, थाळी वाजवून आणि कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करुन देशाला कोरोनाविरोधात मजबूत केले.

देशातील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशा काही घटना पहिल्या लॉकडाउनवेळी घडल्या ज्यामुळे कोरोनाच्या केसेस वाढल्या. दिल्लीतील मरकजच्या प्रकरणाचाही यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी मरकजच्या कार्यक्रमाला दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारांनी जबाबदार धरले होते. त्यावेळी या कार्यक्रमामुळे सुमारे ३० टक्के कोरोनाचा फैलाव संपूर्ण देशभरात झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment