कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेला लॉकडाऊन 4.0 उद्या समाप्त होणार आहे. पुढील लॉकडाऊनचा टप्पा कसा असेल याबाबत अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र केंद्र सरकार नवीन गाईडलाईन्सवर काम करत असून, 1 जूननंतर देशातील अधिकांश भागातील लॉकडाऊनचे निर्बंध समाप्त होण्याची शक्यता आहे. 13 शहरांना सोडून इतर भागातील निर्बंध हटवण्यात येतील. तसेच 1 जून पासून हॉटेल, मॉल्स आणि रेस्टोरेंट्स सुरू होऊ शकते. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.
31 मे रोजी सरकारकडून पुढील 15 दिवसांसाठी गाईडलाईन्स लागू केली जाऊ शकते. दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदुर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टु आणि तिरुवलुर या 13 शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहू शकतात. तसेच हॉटेल्स टप्प्या टप्प्याने उघडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 31 मे रोजी आपल्या मन की बात कार्यक्रमात लॉकडाऊनचा पुढील टप्पा कसा असेल याची माहिती देण्याची शक्यता आहे. मात्र यावर अंतिम निर्णय बाकी आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यांना पुर्ण अधिकार दिले जातील की त्यांना आवश्यक असल्यास कठोर पावले उचलू शकतात. शहरांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंध कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय राज्य घेऊ शकतील. 1 जून पासून काही सार्वजनिक वाहतूक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.