लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक ट्रेनची सुरूवात करण्यात आली. मात्र यातील अनेक रेल्वे आपला मार्ग चुकल्याच्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले की, रेल्वे तयार असून, राज्यांकडून परवानगी मिळताच चालवल्या जातील. कामगारांनी जेथे आहे, तेथेच थांबावे. रेल्वेनुसार 80 टक्के कामगार उत्तर प्रदेश-बिहारला गेले आहेत. रेल्वे आणि राज्यांच्या मदतीने 52 लाख लोकांना घरी सोडण्यात आले आहे.
भरकटलेल्या रेल्वेविषयी रेल्वेने सांगितले की, 1-19 मे आणि 25-28 मे दरम्यान कोणत्याही रेल्वेचा रस्ता चुकला नाही. केवळ 20-24 मे दरम्यान राज्यांकडून अधिक मागणी असल्याने रेल्वेंना डायवर्ट करण्यात आले होते. एका दिवसात 279 रेल्वे चालवण्यात आल्या. कोणत्याही दिवशी 250 पेक्षा कमी रेल्वे धावल्या नाहीत. यातील 90 टक्के उत्तर प्रदेश-बिहारच्या असल्याने ट्रॅकवर गर्दी झाली. आतापर्यंत 3840 रेल्वे चालल्या, ज्यातील 71 रेल्वेला डायवर्ट करण्यात आले. ते ही केवळ 20-24 मे दरम्यान करण्यात आले, जेणेकरून राज्यांची गरज पुर्ण करता येईल.