लॉकडाऊनचे नियमांमध्ये सुट देत सरकारने विमानसेवा सुरू केल्याने परराज्यात अडकलेले प्रवासी आपआपल्या राज्यात जात आहे. विमानसेवेत देखील सोशल डिस्टेंसिंगचे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र या प्रवासातही अनेकांना भिती वाटत असल्याने काही कोट्याधीश चक्क खाजगी चार्टर विमानाने प्रवास करत आहे. नुकतेच श्रीमंत कुटुंबातील केवळ 4 सदस्यांनी भोपाळ ते दिल्ली एअरबस ए320 द्वारे प्रवास केला. 180 सीटर चार्टर प्लेनमध्ये केवळ महिला, दोन मुले आणि एक आजी होत्या. या स्पेशल प्रवासासाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जात आहे.
एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महामारीच्या काळात अनेक श्रीमंत व्यक्ती इतर प्रवाशांसोबत विमान प्रवास करण्यास घाबरतात. एअरलाईन्स आणि चार्टर कंपन्यांकडे अशा खाजगी प्रवासासाठी अनेकवेळा चौकशी केली जाते. श्रीमंत व्यक्ती अथवा कंपन्या स्वतःसाठी अथवा आपल्या नातेवाईकांसाठी पैसे खर्च करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत.
ए320 हे विमान भाड्याने घेण्यासाठी एका तासाला 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच दिल्ली-मुंबई-दिल्ली या प्रवासासाठी हा खर्च 16 ते 18 लाख रुपये आहे. या महामारीच्या काळात चार्टर प्लाईट्सची मागणी वाढली आहे.