बिहारच्या क्वारंटाईन सेंटरमधील एक विचित्र प्रकार सध्या समोर आला आहे. क्वारंटाईन सेंटरमधील एका युवकाच्या भूकेने सर्वांना हैराण केले आहे. क्वारंटाईन सेंटरला या युवकासाठी जेवणाची सोय करणे अवघड होत चालले आहे. हा युवक एकटाच दहा लोकांएवढे जेवतो. त्याला नाश्त्याला 40 चपात्या आणि कितीतरी प्लेट भात लागतो. या युवकाचे नाव अनूप ओझा असून, तो मझवारी क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.
क्वारंटाईन सेंटरच्या लोकांचे म्हणणे आहे की काही दिवसांपुर्वी जेवणात लिट्टी (बिहार-उत्तर प्रदेशमधील एक पदार्थ) बनवली होती. मात्र 60 लिट्टी खाल्यानंतर देखील अनूपचे पोट भरले नव्हते. अनूप स्वतः सांगतो की तो नाश्त्यामध्ये 30-32 चपात्या खातो. अनूपच्या जेवणाविषयी क्वारंटाईन सेंटरमधील लोक सांगतात की सेंटरमध्ये बनवलेले जेवण अनेकदा कमी पडते. अनूप कधीकधी एकटाच 10 लोकांएवढे जेवतो. त्यामुळे पुन्हा जेवण बनवावे लागते. त्याला लोक क्वारंटाईन सेंटरचा कुंभकर्ण देखील म्हणतात.
अनूप राजस्थानमध्ये कामासाठी गेला होता. मात्र लॉकडाऊनमुळे घरी परतल्यानंतर त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.