देशातील या राज्यासाठी धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन


मुंबई – रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या. देशभरात १ मे पासून ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी यामधून प्रवास केला आहे. दरम्यान देशभरात स्थलांतरित मजुरांसाठी सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. एकूण ८५३ ट्रेन गुजरातमधून सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक आहे.

८५३ ट्रेन गुजरातला मिळाल्या असून ५५० ट्रेन महाराष्ट्रातून सोडण्यात आल्या आहेत. तर पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ आणि दिल्लीमधून १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ट्रेन ज्या राज्यांसाठी सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश (१२४५) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे बिहार (८४६), झारखंड (१२३), मध्य प्रदेश (११२) आणि ओडिशाचा (७३) क्रमांक आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारे उचलत आहेत. दरम्यान ट्रेन गेल्या काही दिवसांपासून आपल्या निर्धारित ठिकाणी न पोहोचता भरकटत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेने त्यासंबंधी सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मार्गावर रेल्वे धावत आहेत. सोबतच वैद्यकीय तपासणी होत असल्याने टर्मिनलकडून हिरवा कंदील मिळण्यास उशीर होतो. ही सर्व जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करत ही समस्या सोडवण्यात आली आहे. सोबतच प्रवासासाठी इतर व्यवहार्य मार्गांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment