कोरोना व्हायरस महामारीमुळे मागील दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मध्यम वर्गाला बसला आहे. याच पार्श्वभुमीवर आता नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी सरकारने प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पैसे जमा करावे असे म्हटले आहे. अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्थर डफलो हे जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या ऑनलाईन फेस्टिव्हमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी बॅनर्जी म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात सरकारने पुढील काही महिने प्रत्येक भारतीयाच्या खात्यात कमीत कमी 1000 रुपये जमा करावे. तसेच ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी.
इस्थर डफलो म्हणाल्या की, सरकारने यूनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इनकम (यूबीआय) योजना त्वरित लागू करावी. हे जनधन योजनेचेच एक स्वरूप आहे. दोन्ही अर्थतज्ञांनी ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजनेचे कौतूक केले. मात्र सरकारने त्वरित ही योजना लागू करण्यावर लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले.
काही महिन्यांपुर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना म्हणाले होते की, भारतात मागणीची समस्या आहे. कारण काहीही खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असल्याने आर्थिक मदतीचा गरज आहे. अर्थव्यवस्था पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी मागणी वाढविण्याची गरज असल्याचे, ते म्हणाले होते.