तर यापुढे आमच्या राज्यात यायचे असेल तर आमची देखील परवानगी घ्यावी लागेल


मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापुढे जर इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर त्यांना उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे वक्तव्य केले होते. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल तर महाराष्ट्रात यापुढे येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे देखील आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराच फेसबुक पोस्टमधून राज ठाकरे यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. मनुष्यबळाची जर कोणत्याही राज्याला गरज असेल तर आधी त्या राज्याला या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. त्यांना आमच्या परवानगीशिवाय राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. ज्या पद्धतीने काही राज्यांनी या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती योगी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना योगी यांनी दिल्यानंतर यावरुनच योगी यांना राज यांनी इशारा दिला आहे. यासंदर्भात एका फेसबुक पोस्टमधून आपले मत मांडताना, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसे असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावे, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर सल्ला दिला आहे. ह्या गोष्टींकडे महाराष्ट्र राज्य सरकारनेही गांभीर्याने लक्ष द्यावे. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा, असे आपल्या पोस्टमध्ये राज यांनी म्हटले आहे.

Leave a Comment