चीन-भारत यांच्यामध्ये वाढलेली सीमा वाद, कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर चीन आपल्या नागरिकांना भारतातून काढण्याच्या प्रयत्नात आहे. या संदर्भात नवी दिल्ली येथील चीन दुतावासाकडून नोटिस जारी करण्यात आली आहे. दुतावासाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या नोटिसनुसार भारतात अडकलेले विद्यार्थी, पर्यटक आणि उद्योगपतींना स्पेशल विमानांद्वारे चीनला परतण्याची परवानगी दिली जाईल. किती चीनी नागरिक भारतात आहे, याची अचूक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
परत मायदेशी परतण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना चीनने 27 मे पर्यंत रजिस्टरेशन करण्यास सांगितले आहे. यामध्ये भारतात योगासाठी अथवा बौद्ध धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांचा देखील समावेश आहे.
स्पेशल विमाने कधी उड्डाण घेतील, याची मात्र अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या प्रवासासाठी नागरिकांना तिकीट आणि 14 दिवस क्वारंटाईनसाठी येणाऱ्या खर्चाचे पैसे द्यावे लागतील. कोरोना संक्रमित अथवा कोरोनाचे लक्षण असतील अशा लोकांना प्रवास करण्यास परवानगी मिळणार नाही. नागरिकांना मेडिकल हिस्ट्री न लपवण्याचा इशारा देण्यात आला आहे.