मुंबईवरून उत्तर प्रदेशला निघालेली रेल्वे पोहचली ओडिशाला, रेल्वेचा गजब कारभार

गेली 2 महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत परराज्यात अडकलेल्या कामगारांसाठी सरकारने स्पेशल रेल्वे सेवा सुरू केली आहे. असे असले तरी कामगार पायीच आपल्या घरी जात आहे. मात्र आता रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मुंबईवरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जाण्यास निघालेली रेल्वे थेट ओडिशाला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवरून रेल्वेमध्ये बसलेले लोक जेव्हा सकाळी घरी जाण्यासाठी निघाले, त्यावेळी ते गोरखपूरमध्ये नाहीतर चक्क ओडिशामध्ये असल्याचे त्यांना आढळले.

21 मे ला मुंबईच्या वसई रेल्वे स्टेशनवरून गोरखपूरला रवाना झालेली रेल्वे वेगळ्या मार्गावरून थेट ओडिशाच्या राउरकेला येथे पोहचली. नाराज प्रवाशांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी काही बिघाड झाल्यामुळे रेल्वे चालकाचा मार्ग चुकला.

रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या पुर्ण प्रकरणात रेल्वे चालकाची कोणतीही चुक नाही. ट्रॅकवर गर्दी होऊ नये यासाठी मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र प्रवाशांचे म्हणणे आहे की मार्गामध्ये केलेल्या बदलांची माहिती आम्हाला का देण्यात आली नाही. सध्या हे प्रवासी ओडिशामध्ये अडकले असून, आताही घरी जाण्याची वाट पाहत आहेत. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Comment