लॉकडाऊन दरम्यान गाईची अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल


नवी दिल्ली: देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू आहेच त्याचबरोबर त्यासाठी काही नियमावली देखील सरकारकडून जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार लॉकडाऊन दरम्यान जमावबंदी हा एक नियम आहे. तसेच या व्हायरसला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगदेखील महत्वाचे असल्याचे वारंवार आवाहन शासन तसेच प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण असे असताना उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एक वेगळाच प्रकार घडला आहे. अलीगडमधील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडवत चक्क गाईची अंत्ययात्रा काढली.

ही घटना अलीगडमधील जवां पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मैमडी गावात घडली असून तेथे गाईची अंत्ययात्रा काढत त्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागही घेतला. या घटनेची माहिती मिळताच १५० जणांच्या विरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप करत पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गाईच्या अंत्ययात्रेत या ठिकाणी १०० महिला आणि ५० पुरुष सहभागी झाले होते.


गुरुवारी मैमडी गावात राहणाऱ्या दिनेश चंद्र शर्मा यांच्या गाईचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यानंतर गाईचे अंत्यसंस्कार करण्याची योजना बनवली. ग्रामस्थांनी गाईची अंत्ययात्रा काढायची असा निर्णय घेतला. गाईची अंत्ययात्रा त्यानुसार काढण्यात आली आणि त्यामध्ये १५० ग्रामस्थांनी सहभाग सुद्धा घेतला.

गावातील एका व्यक्तीने याच दरम्यान याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनेची माहिती मिळताच गावात दाखल झाले. पोलिसांना पाहताच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी पळण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी जेसीबी मागवून गाईला दफन केले. यासंदर्भातील वृत्त देणाऱ्या एएनआय या वृत्तसंस्थेच्या मते, अनिल समानिया या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळपास १५० जणांच्या विरुद्ध याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment