मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन


मुंबई : रविवारी रात्री (17 मे) मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. नाट्य आणि साहित्य सृष्टीवर त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेते रत्नाकर मतकरी यांना थकवा जाणवत होता. गोदरेज रुग्णालयात चार दिवसांपूर्वी ते तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण तिथे उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

1955 मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रत्नाकर मतकरी यांनी ‘वेडी माणसे’ या एकांकिकेपासून लेखनाची सुरुवात केली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ही एकांकिका प्रसारित झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु झालेला लेखनाचा प्रवास 81 व्या वर्षापर्यंत अविरतपणे सुरु होता. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारात लेखल केले. त्याचबरोबर बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली होती. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसेच महाभारतातील अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ ही नाटके रंगभूमी अतिशय गाजली.

‘लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझे काय चुकले?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा यासह काही अन्य नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. तर गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी या मालिका, तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट इन्वेस्टमेन्ट, अशी त्यांची इतर माध्यमामधील कामेही रसिकांच्या पसंतीस उतरली.

Leave a Comment