यंदापासून भारतात मान्सूनचे वेळापत्रक बदलणार

फोटो साभार जीएनएस न्यूज

यंदा मान्सून १ जून रोजीच केरळच्या किनारपट्टीवर हजर होणार असला तरी देशात यावेळी त्याचा मुक्काम ४८ ऐवजी ७१ दिवस असेल आणि त्याचा प्रतीचा प्रवास सुद्धा वेगळ्या ठिकाणांहून सुरु होईल असे हवामान विभागातील तज्ञ म्हणत आहेत. या वर्षीपासून मान्सूनचे वेळापत्रक बदलले जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळात येईल आणि देशाभर ८ जुलै ते १७ सप्टेंबर या काळात सक्रीय राहील. राजस्थानच्या पोखरण मध्ये तो १५ जुलै पर्यंत पोहोचेल आणि ११ सप्टेंबर पर्यंत बरसेल. यंदा पूर्ण देशात एकच वेळी मान्सून बरसेल असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे.

यंदा मान्सून परतीचा प्रवास १६ दिवस उशिरा सुरु करेल आणि यापुढेही अशीच परिस्थिती राहणार असल्याने मान्सूनचे नवे कॅलेंडर लागू केले जात असल्याचे समजते. नवीन कॅलेंडर नुसार ही मान्सून १ जून रोजीच केरळ मध्ये येईल पण परतीचा प्रवास उशिरा सुरु होईल. यंदा परतीचा प्रवास इंफाळ, अंध्रातील कलिंगपट्टणम आणि कर्नाटक येथील गंगावती येथुन सुरु होईल. गंगावती येथे दक्षिण पश्चिम मान्सूनचा शेवटचा पाउस पडेल.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले पाउस भरपूर होईल त्यामुळे वीज निर्मिती, धरणातील पाणीसाठा यांची अडचण नाही. पुणे हवामान विभागाचे तज्ञ डॉ. डी. एस पै यांच्या म्हणण्यानुसार मान्सूनचे आगमन आणि प्रस्थान यांच्या तारखा बदलल्या आहेत. काही शहरात तो अधिक काळ मुक्काम टाकेल तर काही ठिकाणी त्याचा मुक्काम थोडा असेल. बाडमेरमध्ये त्याचा मुक्काम २२ दिवस जास्ती असेल तर अहमदाबाद, इंदोर, अकोला पुरी येथे तो थोडा कमी असेल.

Leave a Comment