सीतारामन यांची सोनियांना हात जोडून विनंती; स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोला


नवी दिल्ली – आज सलग पाचव्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यातील माहिती दिली. यावेळी निर्मला सीतारमन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे नाव येताच भडकल्या आणि सोनिया गांधी यांना मी हात जोडून विनंती करते की स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर त्यांनी जास्त जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे, असे सीतारमन यांनी सांगितले.


सीतारमन म्हणाल्या की, विरोधी पक्षांना मला आवाहन करायचे आहे की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर एकत्र काम केले पाहिजे. सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर आम्ही चर्चा करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे.

देशावर कोरोना सारख्या महामारीमुळे आरोग्य आणि आर्थिक संकट ओढवले आहे. देशातील सर्व व्यवहार मागील दीड महिन्यापासून जवळपास ठप्प असल्याची स्थिती असल्यामुळे आर्थिक प्रश्नांनी डोके वर काढले आहे. देशातील सर्व राज्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद असून, आर्थिक अडचणींचा राज्यांना सामना करावा लागत आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या सर्वच राज्यांना केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

Leave a Comment