भारतातील डिजिटल पेमेंट्समध्ये 46 टक्क्यांनी घट

लॉकडाऊनमध्ये सर्व कंपनी, व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच सर्वकाही बंद असल्याने डिजिटल पेमेंटचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. भारतातील डिजिटल व्यवहार या मार्चमध्ये 46 टक्क्यांनी घसरून 156.5 ट्रिलियन रुपयांवर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये हे प्रमाण 292 ट्रिलियन रुपये होते. आरटीजीएसचे प्रमाण वर्षभरात 37 टक्क्यांनी घसरून 120.5 ट्रिलियन रुपयांवर आले आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

मार्च महिन्यातील एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण 13 टक्क्यांनी कमी होऊन मागील वर्षीच्या तुलनेत हे 2.51 लाख कोटी रुपये आहे. मार्च महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण 62 टक्क्यांनी कमी होऊन 54.71 कोटी होते. तर मागील वर्षीच मार्च महिन्यात हा आकडा 89 कोटी रुपये होता. मायक्रो एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये 11 टक्क्यांनी कमी होऊन 11,201 कोटी रुपयांवर आले आहे.

ऑनलाईन इंश्योरेंस, अ‍ॅडव्हान्स कर, कर्जाचे हफ्ते पाहणारे एनएसीएचमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी घट झाली असून, हा आकडा 1.63 लाख कोटीवरून 1.31 लाख कोटी रुपयांवर आला आहे. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग आणि ऑटो-डेबिट प्रक्रिया सुलभ करणाऱ्या ईसीएस व्यवहारांमध्ये अशाच प्रकारे घट झाली आहे.

कार्ड वापरणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये 4 लाख कोटी रुपयांचा व्यवहार कार्डद्वारे झाला होता. जो या वर्षी मार्चमध्ये 1.15 लाख कोटी रुपये झाला आहे. कार्ड स्वाइपिंगचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 146 कोटींवरून 53.5 कोटींवर आले आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत पीओएस मशीनद्वारे डेबिट कार्डचा वापर देखील 25 टक्क्यांनी कमी होऊन 27,238 कोटी रुपयांवर आला आहे. तर मार्चमध्ये पीओएस मशीनवर क्रेडिट कार्डचा वापर 20 टक्क्यांनी कमी होऊन 26,656 कोटींवर आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये ई-कॉमर्ससाठी ऑनलाईन पेमेंटसाठी डेबिट कार्डचे वापर 18.5 टक्क्यांनी कमी होऊन 65,303 कोटी रुपयांवर आला आहे. तर क्रेडिट कार्डचा वापर 17 टक्क्यांनी कमी होऊन 23,918 कोटी झाले आहे. वॉलेट्सचा वापर देखील 22 टक्क्यांनी कमी झाला आहे.

Leave a Comment