नाथाभाऊंचे तिकीट केंद्रीय समितीनेच कापले – चंद्रकांत पाटील


मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्ष काम करतो. संघाच्या विचारसारणीमध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशीच कार्यपद्धती हा आमच्या विचारसारणीचा भाग असून त्यातच घरातील भांडणे बाहेर जाऊ न देता, दुसऱ्याला मोठे करणे फक्त घरातील सदस्यांना मोठे करणे ही संघाची विचारसारणी नसल्याचे सांगताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकिट का नाकारण्यात आले याची कारणमिमांसा केली आहे.

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्याने अशा प्रकारे पक्षाचे वाभाडे काढताना थोडातरी विचार करायला हवा, असे मत व्यक्त केले. आतापर्यंत सात-आठवेळा नाथाभाऊंना संधी दिली गेली आहे. तसेच त्यांच्या मुलाला व सुनेलाही पक्षाकडून संधी देण्यात आल्याचे पाटील म्हणाले. तसेच ८७-८८ पासून नाथाभाऊंना पक्षाने सात वेळा तिकिट दिले. त्यांच्या मुलाला तिकिट दिले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला नसेल का असा विचार बहुतेक केंद्राने केला असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. माझी व देवेंद्र फडणवीस यांची नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवे अशीच भूमिका होती, पण त्यांना केंद्रानेच तिकिट नाकारल्याचे पाटील म्हणाले.

Leave a Comment