..तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना सांगावा


मुंबई : महाविकास आघाडीत विधानपरिषद निवडणुकीवरून समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून या निवडणुकीत काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या या भूमिकेवर संतापले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने उमेदवार मागे घेतला नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप पाठवला आहे. महाविकास आघाडीत सहाव्या जागेवरून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस अद्यापही सहा जागा लढवण्याबाबत ठाम असून त्यातच दुसऱ्या उमेदवारांची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढली आहे. दरम्यान काल रात्री 10 च्या सुमारास शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संपर्क केल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये सहाव्या जागेवरून मतभेद निर्माण झाला असल्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निरोप पाठवला.

Leave a Comment