पुढील महिन्याच्या या तारखेला जाहिर होऊ शकतात दहावी-बारावीचे निकाल


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBCHSE) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिक्षकांचे पेपर तपासण्याचे काम सुरू असून दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आले होते. तसेच पेपर तपासण्याचे काम सुरू झाल्याची माहिती बोर्डाकडून मिळत आहे. मूल्यांकन जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होऊन निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निकाल साधारणतः 10 जूनपर्यंत येईल असा कयास लावला जात आहे. विद्यार्थी हा निकाल mahresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात.

अत्यावश्यक सेवांसोबतच बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे आरोग्य सेवा, पोलीस, डॉक्टर, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकही आपले कर्तव्य निभावत आहेत. पेपर तपासण्याचे काम सुरू झाल्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सध्या शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत. त्याचबरोबर यंदाचे शैक्षणिक वर्ष युजीसीने शिफारस केल्याप्रमाणे सप्टेंबर ते जुलै असे करण्याचा विचार सुरू आहे. त्यावर उदय सामंत म्हणाले, पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै 2020 दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचा प्रवेश लवकरात लवकर देऊन 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave a Comment