पंतप्रधानांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा


नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानेच साजरा केला जात आहे. महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या ट्विटरवरुन मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!, असे ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे.


१०५ हुतात्म्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिनाकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आज हिरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या कोरोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होताना दिसत आहे.

Leave a Comment