माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा ; रिझर्व्ह बँकेकडून कर्जबुडव्यांना ६८ हजार ६०७ कोटींची कर्जमाफी


मुंबई – ५० बड्या कर्जबुडव्यांचे (‘विलफुल डिफॉल्टर’चे) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीचाही या कर्ज माफ करण्यात आलेल्या कार्जबुडव्यांमध्ये समावेश असल्याचे आरबीआयने महिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

५० मोठे कर्जबुडवे आणि १६ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी घेतलेल्या कार्जाची काय स्थिती आहे यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जामध्ये माहिती मागवली होती. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या दोघांनीही त्यावेळी उत्तर दिले नव्हते. म्हणूनच हा अर्ज मी केल्याचे असे साकेत यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

माहिती देण्यास केंद्र सरकारने नकार दिला असला तरी साकेत यांच्या अर्जाला आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी उत्तर दिले आहे. २४ एप्रिल रोजी दिलेल्या या उत्तरामध्ये कर्जबुडव्यांबद्दलच धक्कादायक माहिती समोर आल्याचे साकेत यांनी म्हटले आहे. या रक्कमेमध्ये (६८ हजार ६०७ कोटी रुपये) थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. राइट ऑफ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे करण्यात आली आहेत. कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास देशातील शिखर बँक असणाऱ्या आरबीआयने नकार दिला आहे. बँकेने यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ दिल्याचे साकेत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

चोक्सीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड सर्वाधिक कर्जमाफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज चोक्सीच्या कंपन्यांनी घेतले होते. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. अँटिगाचे नागरिकत्त्व मेहुल चोक्सीने मिळवले आहे. तर चोक्सीचा भाचा आणि १३ हजार कोटींच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे.

आरआयई अ‍ॅग्रो लिमिटेडचा सर्वाधिक कर्ज माफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभऱापासून आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ही कंपनीचा तिसऱ्या क्रमांकावर असून ४ हजार ७६ कोटींचे कर्ज कंपनीने घेतले होते. या कंपनीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या पेन निर्मिती क्षेत्रातील कंपनीचा दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्याच्या यादीमध्ये समावेश आहे. कोठारी ग्रुपचा ही कंपनी भाग असून २ हजार ८५० कोटींचे कर्ज कोठारी ग्रुपने घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदौर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा एक हजार कोटींची कर्ज घेतलेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या आणि कर्जमाफीत समावेश झालेल्या २५ कंपन्या आहेत. या कंपन्यांनी ६०५ कोटी ते ९८४ कोटींदरम्यान कर्ज घेतले आहे.

५० मोठ्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. मागील अनेक वर्षांपासून या कर्जबुडव्यांनी राष्ट्रीय बँकांना फसवले. त्यापैकी अनेकजण फरार आहेत किंवा त्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याचे साकेत यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचा या ५० कंपन्यांमध्ये समावेश आहे. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत.

Leave a Comment