राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचे शिवसेनेकडून समर्थन


मुंबई – शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला काही सल्ले देत आपले मत व्यक्त केले. राहुल गांधींचे शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून कौतुक केले असून राहुल गांधी यांनी संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते दाखवून दिल्याचे म्हटले आहे. देशात कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ पोहोचवायला हवा असेही यावेळी सामनातून सांगण्यात आले आहे.

कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात एखादी तरी चर्चा थेट व्हावी असे, हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. कोरोनाबाबत राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका विधायक आहे. विरोधी पक्ष संकटकाळात कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर सरकार, तसेच विरोधी पक्षाने अशा घोर प्रसंगी काय करावे याबाबत गांधींनी जणू चिंतन शिबीरच घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काही प्रवाद राहुल गांधी यांच्याविषयी असू शकतात. ते तसे कोणाविषयी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत. राहुल गांधी यांच्या प्रतिमाभंजनातून मिळालेले भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश आहे व आजही हे भंजन सुरूच आहे, पण राहुल गांधी यांनी कोरोना युद्धात घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

कोरोना संक्रमणाचा धोका राहुल गांधी यांनी आधीच ओळखला होता व ते त्याबाबत सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते, राहुल गांधी तेव्हा कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा, असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र येऊन लढायला हवे, असे त्यांनी पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या आधी सांगितले आणि पंतप्रधानांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ठासून सांगितले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.

गुरुवारी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सांगितले की, बाबांनो, ही भांडण्याची वेळ नाही. गांधी पुढे सांगतात ते महत्त्वाचे. माझे पंतप्रधान मोदींशी अनेक बाबतीत मतभेद असू शकतात, पण ही वेळ मतभेद उगाळत, भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. राहुल गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

पंतप्रधानांनी देशातील ‘लॉकडाऊन’ वाढवला आहे व ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर आर्थिक अराजकाच्या संकटाशी सामना करावा लागेल. सरकारने त्याबाबत काय केले? लोकांनी राष्ट्र सेवा म्हणून घरी बसावे हे ठीक, पण राष्ट्र सेवा आणि उपासमार एकत्र नांदू शकत नाही. दोन प्रमुख विषयांना राहुल गांधी यांनी हात घातला आहे व ते सुद्धा राष्ट्रहिताशी निगडित आहेत. ‘लॉकडाऊन’ हा एकमेव उपाय नव्हे, तर ‘पॉज बटन’ आहे. ‘लॉकडाऊन’ उठले की विषाणू परत त्याचे काम सुरू करेल. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. व्हायरसचा पराभव ‘लॉकडाऊन’मुळे होत नाही. वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी ‘लॉकडाऊन’मुळे वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी, असे विरोधी पक्ष नेते सांगतात. गांधी सांगतात ते शंभर टक्के खरे आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. पण त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

हे जे सर्व मार्गदर्शन राहुल गांधी यांनी केले ते देशहिताचे आहे. हे सरकारकडून समोर येणे आवश्यक असते, पण रोज संध्याकाळी देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रटाळ पत्रकार परिषदा घेऊन कोरोनाबाबत माहिती दिली जाते. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment