देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. आता एसबीआय 30 जून 2020 पर्यंत आपल्या ग्राहकांच्या एटीएम व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
एसबीआयचा मोठा निर्णय, एटीएम कार्डवरील व्यवहारांवर लागणार नाही शुल्क
ग्राहकांना एसबीआय अथवा दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून वारंवार पैसे काढले तरी यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय बँक पुढील तीन महिने मिनिमम बँलेसवर चार्ज देखील वसूल करणार नाही.
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना पैशांच्या समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, एटीएम उपयोगाचे शुल्क 30 जून 2020 पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे व्यवहार एसबीआय अथवा दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून केले तरी शुल्क आकारले जाणार नाही.
याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली होती की, ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 महिन्यापर्यंत म्हणजेच 30 जूनपर्यंत विना शुल्क व्यवहार करू शकतील.
