रतन टाटांच्या ‘भारतरत्न’साठी ऑनलाइन याचिकेचे लाखो नेटकऱ्यांकडून समर्थन


मुंबई – टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष असणाऱ्या रतन टाटा यांचा देशातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा यासाठी एक ऑनलाइन याचिका नेटकऱ्यांनी केली आहे. दोन लाख ४० हजारांहून अधिक जणांनी चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून केलेल्या या याचिकेला पाठिंबा दर्शवला असून पाठिंबा दर्शवणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या ऑनलाइन याचिकेनुसार, परोपकार आणि मानवतेचे रतन टाटा हे उत्तम उदाहरण असून अनेक संशोधनांसाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. टाटा ग्रुप्सच्या मदतीने उभारण्यात आलेल्या संशोधन संस्थांची यादीही दीड आठवड्यापूर्वी करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये देण्यात आली आहे. तसेच रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजसेवेचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

देशामधील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एक हजार ५०० कोटींचा निधी देणार असल्याची टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने घोषणा काही आठवड्यांपूर्वी केली होती. रजन टाटांनी २८ मार्च रोजी एक ट्विट केले होते. त्यांनी या ट्विटमध्येच देशामधील कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टाटा ग्रुपच्या कंपन्या शक्य ती मदत करतील असे म्हटले होते. कोरोनाचे संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मदत केली आहे. सध्याचे संकटात देशाला मदतीची गरज असल्याचे टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

हा निधी कोरोनाशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे टाटांनी पोस्ट केलेल्या ट्विटमधील फोटोमध्ये नमूद करण्यात आले होते. कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी श्वसनप्रणाली निर्माण करणे, दरडोई चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी टेस्टींग किटची निर्मिती करणे, संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे, आरोग्य कर्मचारी आणि सामान्यांपर्यंत कोरोनासंदर्भातील जनजागृती करुन त्याबद्दलचे व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे अशा कामांसाठी पैसे वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

चेंज डॉट ओआरजीवर रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासोबतच टाटांसंदर्भातील जवळजवळ डझनभर याचिका असल्याचे दिसून येते. अगदी रतन टाटा यांनी राष्ट्रपती करावे यासंदर्भातील याचिकाही या वेबसाईटवर आहे. रतन टाटांना भारताचे राष्ट्रती करावे. प्रत्येक वेळेस राजकारण्यालाच का संधी द्यायची? असा सवाल विचारणारी याचिकाही या वेबसाईटवर आहे. अर्थात तिला अगदीच कमी म्हणजेच केवळ ८३ लोकांनी समर्थन दर्शवले आहे.

Leave a Comment