कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी निधी जमा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका व्हावी असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. यावर भारत-पाकिस्तानच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
एकवेळ लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, पण भारत-पाक मालिका अशक्य
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील ही मालिका शक्य नसल्याचे म्हटले होते. त्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदेने प्रत्युत्तर दिले होते. आता यावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. मात्र सध्याच्या स्थिती पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका शक्य नाही. ते पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होते.
ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया कप, विश्वचषक अथवा अन्य आयसीसी स्पर्धेत समोरासमोर येऊ शकतात. मात्र या दोन्ही देशांमध्ये मालिका शक्य नाही.
दरम्यान, याआधी शोएब अख्तरचा प्रस्ताव नाकारत कपिल देव म्हणाले होते की, आम्हाला पैशांची आवश्यकता नाही आणि क्रिकेट सामन्यासाठी जीव धोक्यात घालणे समजदारी नाही. आम्हाला पैशांची आवश्यकता नसून, आमच्याकडे पर्याप्त आहे.
पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीने देखील शोएब अख्तरच्या प्रस्तावाच्या समर्थन केले होते.
