वाशी एपीएमसी उद्यापासून पूर्णपणे बंद


नवी मुंबई : वाशी येथील एपीएमसी मार्केट जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. पण आता मसाला मार्केटचा व्यापारी कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणीनंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. येत्या शनिवारपासून भाजी, फळ, कांदा, बटाटा मार्केट बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.

दुसरीकडे मुंबईत 2.5 लाख टन अन्नधान्य दाना मार्केटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याने पुढील एक महिना पुरेल एवढा साठा शिल्लक असल्यामुळे राज्यभरातून आणि परराज्यातून आलेले अन्नधान्य मुंबई, उपनगर, नवी मुंबईत पोहोचविल्यानंतर दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत माथाडी कामगार, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी प्रशासन रविवारी बैठक घेवून निर्णय घेणार आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा एपीएमसीमधून मुंबईत करण्यात आल्याने बाजार पुढील काही दिवस बंद राहिला तरी लोकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठ्या शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. मोठ्या शहरांमध्ये भाजी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीबाबत काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असूनही लोक शहरात अजूनही भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जातात. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने याबाबत काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सरकार मोठ्या शहरात भाजी मार्केट बंद करण्याच्या विचारात आहे.

Leave a Comment